गुरुवार, १४ जुलै, २०११

मंतरलेले दिवस - ३१

 कल हो ना हो..

"मुंबई पुन्हा हादरली, तीन स्फोटांची मालिका.. संपूर्ण महाराष्ट्र हादरलं.." मन सुन्न झालं.. निष्पाप जीवांच्या उरावर का बसतात हे लोक समजत नाही.. अतेरिकी , राजकारण हा भाग वेगळा पण त्रास कोणाला झाला.. सफर कोण झालं.. किती गेले, किती जखमी झाले अन कितीजण थोडक्यात वाचले?  त्यातले कित्येकजण खरेदीला गेले असतील, कोणी ऑफिस मधून परतत असतील, कोणी काही कामासाठी बाहेर पडले असतील तेव्हा ते परत कधी येणार नाही अशी शंका त्याच्या घरच्यांच्या किवा स्वतः त्यांच्या मनात चुकूनतरी आली असेल का? त्यांच्यातले कोणी कोणाला भेटून निघाले असतील ती भेट शेवटची याची कल्पना त्यांना असेल का? काहीजण  कोणाला भेटायला निघाले असतील तेव्हा वाट बघणाऱ्याची हालत काय झाली असेल?

बॉम्ब स्फोट ही एक घटना.. तसं भूकंप, पूर, साथीचे रोग (स्वायिन फ्लू), अपघात अशा अचानक उद्भवणाऱ्या अनेक आपत्तींना मनुष्याला तोंड द्यावे लागते.. एक ना एक दिवस प्रत्येकाची वेळ येते.. मरण अटळ आहे.. हे असं इतकं माहिती असताना आपण आपल्या हाताने नाती का तोडायची?  वेळ नाही म्हणून आपल्या सख्यासोयारयाना टाळायचं.. ज्यांच्याशी आता संबंध आहे त्यांच्याशीच बोलायचं अन बाकीच्यांना अजिबात भाव द्यायचा नाही..  'मी का म्हणून' असा खोटा अभिमान धरून संपर्क तोडायचा..  वर्ण, धन संपत्ती, पद, जात अशा हजारो गोष्टीनी आपापसात भेदभाव करायचा.. स्वतः कडे सगळं आहे म्हणून माज करयचा आणि दुसर्यांना कमी लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं.. मनात कोणाबद्दल कशाबद्दल तरी राग धरायचा आणि बोलायचं नाही.. कोणाशीतरी वैर धरायचं..  स्वतःचे हित पाहिचे, बाकीचे गेले उडत..

दोन घडीच आयुष्य आपलं..  आज आहे उद्या नाही, कसलाच भरवसा नाही.. मग कोणाशी असं का तोडून वागायचं? एखाद्याचा काही चुकत असेल किवा त्याच्याबद्दल  काही शंका/संशय असतील  तर ते मनात ठेवण्यापेक्षा स्पष्ट बोलून दाखवलं तर सुधारणा होऊ शकते ना.. वेळ नसेल मिळत तर तसा नीट पद्धतीने सांगू शकतोना..  आणि तुम्ही सुंदर गोरेपान, हुशार असताल, पैसेवाले असताल, तुमचं नशीब बलवत्तर असेल त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना यश येत असेल, तुमचं वेळेवर सगळं होत असेल पण या गोष्टी क्षणिक आहेत.. काळाप्रमाणे बदलणाऱ्या आहेत.. त्यामुळे उन्ह असो वा  पाऊस, आपण एक माणूस म्हणून नेहमी जमिनीवर राहिलं पाहिजे आणि समोरच्याचा एक माणूस म्हणून नेहमी आदर ठेवला पाहिजे भले तो कोणी का असेना..

प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे आहे असा समजून वागला तर जीवन प्रवासाला खूप वेगळे वळण मिळते.. आज आपण या व्यक्तीशी शेवटचं बोलणार आहोत असं समजायचं.. मग समोरच्यासाठी आपोआप आपलं मन मोठं होतं.. मी हे अनुभवलं आहे.. कैलास मानसला जाताना मी परत येणार नाही अशा भावनेने तयारी केली होती.. सगळ्यांचा निरोप घेतला होता..  अगदी माझ्या खाजगी गोष्टींचं पुढे काय करायचं याची सोय लावून गेले होते म्हणूनच मी त्या अनोळखी लोकांबरोबर यात्रा मस्त एन्जोय करून येऊ शकले.. सरळ शुद्ध मनाने केलेल्या सगळ्या गोष्टीना यश मिळतं, होना..

म्हणून माझी मनापासून नम्र विनंती आहे की ज्यांना तुम्ही हवे आहात त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना तुमचा वेळ द्या.. तुम्हाला त्या व्यक्ती आवडत नसतील तरी त्यांच्याशी नातं तोडू नका.. कारण थोड्याच दिवसांचा प्रश्न असतो हा.. और फिर क्या पता कल हो ना हो..

चाहे जो तुम्हें पूरे दिल से
मिलता है वह मुश्किल से
ऐसा जो कोई कहीं है
बस वही सबसे हसीं है
उस हाथ को तुम थाम लो
वह मेहरबाँ कल हो न हो

लहान तोंडी मोठं घास झाला असल्यास माफी असावी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: