सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ७१

Together We Can Do It! :)

या गोष्टीची सुरुवात तसं  म्हणायला ऑगस्टमध्ये घाटघर ट्रीपपासून झाली.. आणि त्यास दुजोरा मिळाला ते एकांश संस्थेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामुळे..  तेव्हा मला अगदी भरघोस प्रतिसाद मिळाला होता.. बरेच जण  आम्हालाही असे काही करायचे आहे, पुढच्या वेळेस नक्की सांग असे मला बजावून ठेवत होते..

एकेक म्हणत यादी वाढतच गेली कि शेवटी मला एक संघ का तयार करू नये असे वाटू लागले..   माझ्या नशिबाने मला खूप चांगले मित्र मैत्रिणी लाभले आहेत.. सगळे विविध क्षेत्रात उंचीवर असेलेले..  जो तो आपल्यापरीने इतरांना मदत करतच असतो पण असे आपण सगळे एकत्र आलो  तर नक्कीच काहीतरी चांगले मोठे कार्य घडले जाईल यात काहीच शंका नव्हती, मग वाट  कसली बघायची..  जास्त विचार न करताच  'Together We Can Do It!' हा ग्रुप  सुरु केला.. प्रत्येकाला आपले आपले व्याप असतात त्यामुळे यामध्ये अजिबात बांधिलकी ठेवायची नाही असे ठरवले.. ज्यांना मनापासून वाटतं त्यांनी यावे असं सोपं गणित..  एकाच ठिकाणी अडकून न राहता वेगवेळ्या जागांना भेट देऊन आपल्याला शक्य आहे तेव्हढी मदत करायची.. त्यातून  खूप काही शिकायला मिळणार हे तर निश्चितच..

मग काय मेलामेली सुरु झाली, चर्चा चालू लागल्या..  नुकतच कोथरूड अंध शाळेबद्दल समजले होते तर पहिला उपक्रम तिकडेच करावा वाटले.. म्हणून मग ७ सप्टेंबरला आमच्यापैकी थोडे जण शाळेत जाऊन आलो, माहिती काढून तिथे काय काय करता येईल हे पाहिले.. त्या दिवशी आम्ही खरच भारावून गेलो.. ती शाळा इतकी व्यवस्थित शिस्तीत अन खेळी मेळीत चालवतात हे अगदी जवळून पहिले.. मुलीपण खुश दिसल्या तिकडे..

१५ सप्टेंबर , पुढचा शनिवार निश्चित केला, त्यावेळेस कोणाकोणाला वेळ आहे वगैरे चर्चा सुरु झाल्या.. असे आम्ही लगेच ७/८जण जमलोही.. फेसबुकवर तर अशक्य भारी प्रतिसाद मिळत होता.. अगदी  वेगवेगळ्या देशात असलेले मित्रमैत्रीनीही शुभेच्छा देऊन एक प्रकारचा मानसिक आधार देते होते..

आमच्या पैकी सगळे वेगवेगळीकडे राहणारे, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारे.. त्यामुळे मेलवरच आराखडा ठरला.. काय काय करायचे, कितीवेळ, कसे.. :) हे सगळे ठरवताना खूप मजा आली हे वेगळे सांगायला नकोच.. एक नवा उत्साह संचारला आहे अशी जाणीव होत होती.. काहींना अगदी मनापासून वाटत होते पण काही कारणाने त्यांना जमत नव्हते त्यामुळे त्यांना हळहळ वाटत होती पण आता हि सुरुवात होती, असे काहीना काही आपण नेहमीच करत राहणार असं विश्वास आम्ही त्यांना देत होतो..

शेवटी ज्या क्षणाची अतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला.. आज शनिवारची सकाळची शाळा असते.. शाळा सुटल्यावर दुपारी अडीच वाजता आमचा कार्यक्रम सुरु होणार होता.. यावेळेस ग्रुपमध्ये सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांची एकेमेकिंशी ओळख व्हावी आणि कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्यक्ष भेटून ठरवावी याकरिता आम्ही सगळ्याजणी तासभर आधीच भेटलो..  तळेगाववरून सोनिया, निगडीवरून स्मिता आणि हडपसरवरून येणाऱ्या शिल्पाचे मला फार फार आश्चर्य वाटले.. त्यांच्या जागेवर दुसरे कोणी असले असते तर  'शाळा लांब आहे' हे कारण सांगून टाळले असते.. आपल्या छोट्या लेकीला झोपवून आलेल्या सुचित्राचेपण कौतुक करू तितके कमीच.. आणि सतत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, ऑफिसमध्ये , घरी पाहुण्या मंडळींमध्ये व्यस्त असणारे दीपाली आणि मुकुंद यावेळेस खास वेळ काढून आले होते, मला खूप आनंद झाला होता..  शाळेच्या शांत सुंदर आवारात ओळखी अन गप्पा झाल्या.. मुलींचा नाश्ता चालू होता.. या शाळेत बाहेरून खायचे घेऊन जायला परवानगी नाही म्हणून आजच्या नाश्तायचे पैसे आम्ही दिले होते.. २.३०च्या आधीच आम्ही शाळेच्या हॉलमध्ये मुलींची वाट पाहत बसलो.. आता पुढे कसे कसे होणार याबद्दलची उत्सुकता सर्वांच वाटत होती..

पाऊणे तीन वाजले तरी मुलींचा पत्ता नव्हता म्हणून मी अन स्मिता खाली बघायला गेलो.. शाळा सुटली म्हणून खाऊ खाऊन मुली त्यांच्या झोपायच्या खोलीत रेंगाळत होत्या.. मी सर्वांना म्हणले, चला चला आम्ही वाट पाहतोय.. तर मुली माझ्या जवळ येऊन हात धरून म्हणाल्या तिकडे परीक्षा नाहीना, काय आहे तिकडे वगैरे.. मी म्हणले गम्मत आहे,चला तर पाहूया.. हळू हळू घोळक्या घोळक्यात मुली हॉलमध्ये जाऊ लागल्या.. मी दुसर्या खोलीत गेले, मुलींना प्रेमाने चला म्हणले.. तर सगळ्या छोट्या छोट्या मुली माझ्या भोवती जमा झाल्या, काहींनी माझे  हात घट्ट धरले अन जणू काही  त्याच मला  हॉलमध्ये घेऊन जात होत्या.. एक गोष्ट इथे आवर्जून सांगावी वाटते कि त्यांच्या हालचाली इतक्या सहज होत्या कि त्यांच्यात काही कमी आहे असे मुळीच जाणवत नव्हते.. 

आता हॉल भरला होता, मुलींना ओळीने आम्ही बसवत होतो.. मुली काय गम्मत आहे यासाठी उत्सुक होत्या अन त्यांचा गोंधळ चालू होता.. आम्ही ६/७ जण होतो.. मुलींच्या कोणत्याही बाई सोबत नव्हत्या.. खरेतर आम्ही दीपालीच्या प्रर्थानेपासून कार्यक्रम सुरु करणार होतो.. मुलींचा असा हा कलका जरा अनपेक्षितच होता.. पण तेव्हढ्यात  सुचित्राने एक खेळ सुरु केला, शिवाजी म्हणले डोक्यावर हात ठेवा तर सर्व मुलीनी शांत होऊन डोक्यावर हात ठेवला, असंच मग टाळी वाजवा वगैरे करायला सांगून सगळ्यांना खेळत सामील करून घेतले.. ही एक खास कला आहे, आम्ही सर्वांनी सुचीत्राला मानले.. नंतर तिच्याकडून अशा खेळांचे प्रशिक्षण आधी आपण घेऊ असे ठरवले..  आता दीपालीने तिच्या गोड आवाजात अन सुरात रामाची प्रार्थना  सुरु केली,सुचित्राही तिच्यासोबत होती.. त्या दोघींच्या मागे आम्ही सर्व मुली एकेक ओळ म्हणत होतो.. काही मुली खरच हात जोडून डोळे बंद करून मनापासून गात होत्या,सुरुवात छान झाली.. नंतर प्रत्येकीची ओळख करून घेतली..

त्यांनतर महाराष्ट्र राज्य स्तरावर कथा लेखनाच्या स्पर्धे मध्ये बक्षीस मिळवलेल्या कौशल्याची गोष्ट सर्वांना वाचून दाखवायची होती.. खरतर इथे सर्व वयोगटातल्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या मुलींपासून कॉलेजच्या मुलींपर्यंत सर्व मुली होत्या.. ती गोष्ट बरीच  मोठी होती, ती सर्वांना कळेल का अशी शंका आम्हाला वाटत होती पण कौशल्याच्या कौतुकासाठी दीपालीने ती गोष्ट सर्वांना वाचून दाखवली.. आणि विशेष म्हणजे मुलींनी ती मन लावून ऐकली.. काही छोट्या मुलींची चुळ बुळ चालू होती पण इतरांनी मात्र शांतपणे ऐकली.. त्या मुलींना असं ऐकूनच अभ्यास करायची सवय असतेना.. शिवाय  ती गोष्ट अतिशय उत्तम लिहिली होती,आम्ही पण ऐकतच राहिलो..

आता २ गट करण्यात आले.. ज्यांना चित्र कलेत रस आहे त्यांना कागत आणि रंगीत खडू दिले.. स्मिता अन शिल्पा सर्वांना लागेल ते साहित्य देत होत्या.. दुसर्या गटात ज्यांना चित्र काढायचे नव्हते त्यांच्यासाठी सुचित्रा आणि दीपाली खेळ घेत होत्या.. हा आमच्या योजनेतला भाग नव्हता, ऐन वेळेस खेळ घायचे ठरले ते सुचित्रा दिपालीने छान घेतले.. स्मिता, मुकुंद दोन्ही ग्रुपमध्ये लागेल ती मदत करत होते..  सोनिया आणि मी चित्रकलेच्या इथे सर्वांना काय हवंय नकोय ते पाहत होतो.. काही मुलींनी शिस्तीत स्टूल आणून त्यावर ठेवून चित्र काढायला सुरुवात केली.. आम्ही त्यांना पाहिजे ते आवडेल ते काढायला सांगत होतो.. बर्यापैकी मुली  निसर्गाचे चित्र, डोंगर,सूर्य, पक्षी, घर, नदी, झाड, फुले  वगैरे काढत होत्या.. काहींना थोडसं दिसत होता त्या अगदी वाकून जवळ जाऊन चित्र काढत होत्या.. पाचवीच्या पुढच्या मुलींना शाळेत चित्र कादाह्यचे शिकवले जाते असे त्या मुली सांगत होत्या.. काही जणींची चित्रे इतकी सुंदर होती कि मला दोन डोळ्यांनी दिसूनही तसे आयुष्यात कधी काढता येणार नाही, अतिशयोक्ती नाही.. काही मुली सांगायच्या ताई, मला निळा  रंग दे, मग आपण त्यांना निळ्या  रंगाचा खडू काढून द्यायचा मग त्या त्याने पाणी किंवा आकाश काढायच्या.. प्रत्येकीच्या जवळ जाऊन आम्ही सगळे त्या काय काढत आहेत वगैरे गप्पा मारत होतो तेव्हा आमचे त्यांच्याशी छान सुत जमले..  एक गम्मत झाली.. माझ्या सारख्या चित्रकलेचा गंध नसलेल्या मुलीला एकीने  फुल काढायला  शिकवायला सांगितले, बापरे आता मी काय करू असे मला झाले.. तिचे बोट धरून मी माझ्या बोटांनी एक फुल काढले, साधे सोपे.. :) ती म्हणली ती सराव करेल म्हणून.. तिथे दुसरीकडून गाण्यांचा , टाळ्यांचा आवाज येत होता.. पासिंग द पार्सल वगैरे खेळ चालू होते.. आम्ही या सगळ्यात  इतके व्यस्त होतो कि कधी ४ वाजले कळलेच नाही.. आता हळू हळू चित्रे गोळा करायला लागलो.. तेव्हा त्या प्रामाणिक मुली चित्रांसोबत खडूची पेटीसुधा परत देत होत्या,आम्हाला भरून आले.. किती हा निरागसपणा.. ते रंग, कागद त्यांच्यासाठीच सगळे आणले आहे हे ऐकून त्या खुश झालेल्या दिसत होत्या..

आता परीक्षकाचे काम सोनिया करत होती.. ती म्हणली कि बरीच चित्र इतकी सुंदर आहेत कि यातील फक्त ३ क्रमांक काढणे अवघड  आहे.. म्हणून मग आम्ही जास्त बक्षिसे द्याची ठरवले.. पण पाकिटे कमी होती मग स्मिताने कागदाची पाकिटे करायला सुरुवात केली.. दीपालीने कात्री सेलोटेप आणलं होतं.. मी म्हणले ट्रेकिंगला कसे आम्ही मेडिकल कीट घेतो तसे अशा कार्यक्रमांना कात्री, सेलोटेप वगैरे घेणे महत्वाचे कसे आहे हे आज समजले.. यातूनच आम्ही खूप काही शिकत होतो.. सोनिआने नंतर सुचवले कि पाकिटे तशीही आपण बाईंना देणार आहोत तर एकच रक्कम देऊ,  बाई मुलींच्या खात्यात जमा करतील.. आता ऐनवेळेस हे सुचणेपण भारीच होते.. म्हणजे पहाना सगळ्या जणींची विविध कौशल्ये मिळून आमचा हा उपक्रम चांगल्या रीतीने पार पडत होता!!! :)

नंबर काढेपर्यंत मुलींना दम नव्हता, कोणी जवळ येऊन म्हणयचे काय बक्षीस देणार आहात..  शेवटी आम्ही १५ मुलींना चित्रकलेत आणि ६ जणींना इतर खेळासाठी  - गाण्यासाठी बक्षिसे जाहीर केले.. नंतर नावांची यादी अन पैसे बाईंकडे सुपूर्त केले.. निघताना मुली अगदी स्वतहून येऊन आवडलं, thanks म्हणून जात होत्या.. काहीजणी बर्याच गप्पा मारत होत्या.. एकंदर कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असे आम्हा सर्वांना वाटत होते..  

मुलींचा निरोप घेऊन ५नन्तर आम्ही ग्रुपवाले चहा घ्यायला गेलो.. आज काय  काय झाले , पुढे अजून कशी कुठे सुधारणा करता येईल आणि पुढचे  कार्यक्रम याबद्दल चर्चा केली.. आम्ही सगळेच एका वेगळ्या आनंदात अन समाधानात दिसत होते.. ही तर सुरुवात आहे,  खूप काही करायचे आहे!!! :)

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ७०

हल्ली रोज सकाळी घरातून बाहेर पडते तेव्हा हिरवीगार झाडे शुभ्र धवल फुलांनी बहरलेली दिसतात.. नाजूक पानेफुले पावसांच्या पाण्यामध्ये चिंब भिजलेली दिसतात.. जाई, जुई, सायली यांचा सुगंध हवेत दरवळत असतो..  फुले किती प्रकारची असतात ना..  किती विविध रंगाच्या छटा पहावयास मिळतात.. आपल्यासारखेच तेही जन्म घेताना नशीब घेऊन येतात.. कोणी सुंदर असते, कोणी सुवासिक असते.. कोणाला शोभेसाठी वापरले जाते.. कोणाला स्त्रीच्या केशरचनेत बसायचे भाग्य मिळते.. कोणी प्रेमाचे प्रतिक बनते.. काहीना नेत्यांच्या अन वीरांचा सहवास मिळतो.. तर काही दोन जीवांच्या विवाहाचे  साक्षी ठरतात..  कोणी भून्ग्यासोबत खेळते.. कोणी झाडे वेलीन्वरच  डोलतात..  तर काही खास फुले देवांच्या, संतांच्या गळ्यामध्ये अन चरणकमलांवर विराजित होतात आणि त्यामुळे त्यांचा जन्म सार्थकी लागत असेल..

काही फुले मात्र एखाद्या सरीने किंवा वाऱ्याच्या धक्याने गळून पडतात.. अशा फुलांना कोणीच वाली नसतं..  कोणीतरी येऊन धक्का देतं आणि त्यांचं आयुष्य बदलतं..  मी रोज पाहते, लोकं चढून वाकून पूजेसाठी किंवा गजरयासाठी चांगली चांगली फुले निवडतात.. पण मग खाली पडलेल्या फुलांना किती वाईट वाटत असेल.. त्यांना कोण उचलणार? त्यांनाही आतून ओढ लागतच असेलना परमेश्वर भेटीची..

असाच विचार करता करता रस्त्यावरच्या एका पुष्पाने मला आकर्षून घेतले.. मी सहज हातात घेतले अन पहिले.. किती ती कोमलता, नाजूकता.. पावसाच्या पाण्याने अन रस्त्यावरच्या चिखलाने ते एका चिखलात खेळणाऱ्या अल्लड बालकाप्रमाणे दिसत होते..

पुढे काय होत असेल अशा फुलांचे.. मातीत विरघळून जात असतील का? एखादी गाडी किंवा मनुष्याचा पाय त्यास चीरडवून जात असेल का?  विचार करवतच नव्हतं.. चालत चालत मी गणपतीच्या मंदिरापाशी आले.. अन त्या फुलाला देवापाशी अर्पण केले.. शेवटी सर्वांना तिकडेच जायचे आहे पण हा अंत काळ तरी चांगला जावा असे वाटले..

अशा प्रकारे या सृष्टीत नाना तर्हेने मलीन झालेल्या जीवांना भगवंताचे सानिध्य सदगुरूंकडून लाभत असेल.. असेच भाग्य तुम्हा आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

श्यामवर्णी तू मेघराजा तू..

श्यामवर्णी तू मेघराजा तू..  अंगणात माझ्या बरस रे..
असंच अविरत अन वेड्यागत.. सरींवर सर कोसळ रे ..

लडिवाळपणे नाचत वाजत..  चिंब चिंब भिजव रे..
जड देहाचे जड वस्तूचे.. विस्मरण मला घडव रे..

शुभ्र मोती तव बिंदूंचे..  खोल खोल रुजव रे ..
विरघळवूनी विचार सारे.. मनात अत्तर  शिंपड  रे..

कणकण सारे निर्मळ करुनी..  आसमंत हा सजव  रे..
क्षणक्षण नवचैतन्याने भरुनी..  अंतरंग हे फुलव रे..

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

मंतरलेले दिवस - ६९

आज पर्यंत मी मोठमोठ्या साहित्यिकांचे वाचन केले.. मी स्वतः मला आलेले कितीतरी अनुभव लिहिले,इतरांना दाखवले.. पण याहून मौल्यवान असलेल्या खास अशा साहित्याचा मला नुकताच शोध लागला.. त्यावर आधारित हा लेख लिहित आहे. 

त्यादिवशी अंजली ताईंचे  (गीतांजली जोशी) फेसबुकवर इन्व्हाईट आले होते..  साहित्यातील - कवितेतील  त्यांची उंची  आणि प्रेम या गोष्टींनी त्या सुप्रसिद्ध आहेतच पण मला विशेष भावते ते त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व.. ना सी फडके यांच्या कन्या असून अहंकाराचा किंचितही स्पर्श जाणवत  नाही.. आणि त्यांचे सामाजिक कार्य मला नेहमीच त्यांच्याकडे आकर्षून घेते.. मी उत्सुकतेने पाहिले ,कसले आमंत्रण आहे ते.. "दृष्टिहीन बांधवांच्या  लघुकथा स्पर्धेचा  पारितोषिक वितरण सोहळा.."  मी लगेचच अंजली ताईंना फोन केला,माहिती विचारली.. त्या म्हणल्या तू ये,तुला आवडेल.. आणि तू आलीस तर आम्हालाही आवडेल.. बास मग मी लगेचच जायचे निश्चित केले.. घरून जरा आरडाओरड झाली.. म्हणजे मी सारखी कुठेतरी भटकत असते म्हणून.. पण या कार्यक्रमाची माहिती दिल्यावर ते ठीक आहे म्हणले..

कार्यक्रम गणेशखिंड येथील  बालशिक्षण संस्थेत होता.  तिकडे गेल्या गेल्या अंजली ताई म्हणल्या, माझी छोटी मैत्रीण अजून कशी आली नाही असा विचार करत होते मी..  :)  लगेचच कार्यक्रम सुरु झाला.. पुढे पहिल्या रांगेत विजेते बसले होते.. व्यासपीठावर  एकांश संस्थेच्या अनिता अय्यर, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय जैन, बालकल्याण संस्थेच्या मिनिता  पाटील आणि गीतांजली जोशी असे मान्यवर उपस्थित होते.  सर्वप्रथम अनिता म्याडम यांनी लघुकथा स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.. लेखनातून आपण आपले विचार अनुभव मांडत असतो.. आतापर्यंत दृष्टिहीन व्यक्तींनी पण लेखन केले पण ते कल्पनेतून साकार झालेले किंवा इतरांकडून ऐकलेल्या वर्णनावर आधारित होते.. या स्पर्धेची कल्पना थोडी वेगळी होती.. दृष्टिहीन व्यक्तींनी त्यांना आलेले खरे अनुभव , त्यांचे विचार मांडायचे असा आशय होता.. त्यांचेही एक जग आहे, तेही सुंदर आहे याची सर्वाना जाणीव व्हावी, माहिती व्हावी हा हेतू होता.. संपूर्ण  महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला होता अन त्यातून प्रथम ३ क्रमांक आणि २ उत्तेजनार्थ निवडले गेले.. त्यासाठी परीक्षक मंडळींमध्ये लेखक राजन खान, सकाळचे मल्हार अरणकल्ले आणि प्राध्यापक जैन हे होते.  यास्पर्धेसाठी गीतांजली जोशी यांची खूप मदत झाली असे अनिता म्याडमने आवर्जून सांगितले.. त्यानंतर अंजली ताई त्यांच्या मधुर  वाणीतून बोलल्या.. त्या  हा उपक्रम पुढे जाण्यासाठी खास कार्यशाळा घेणार आहेत असे म्हणल्यावर सारेजण खुश झाले..  मीपण माज्या परीने जी काही मदत करता येईल ती करेन असे मनोमनी ठरवून टाकले..

आता प्राध्यापक संजय जैन यांनी बोलायला सुरुवात केली आणि कार्यक्रम एका उंचीवर गेला.. ते विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि ते स्वतः दृष्टिहीन आहेत हे मला तेव्हाच कळले.. त्यांनी स्पर्धकांच्या कथा वाचताना आलेले विचार मांडले  कथा उत्तम आहेत, सर्व स्पर्धकांमध्ये लेखनाची आवड आणि गुणवत्ता आहे.. अंजली ताई म्हणल्याप्रमाणे कार्यशाळा घेऊन यांना लिहिण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे सगळेजण पुढे जातील यात तीळमात्र शंका नाही.. नंतर त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले..  आपली भाषाच कशी विचित्र आहे, एखाद्याला आपण किती सहजतेने 'आंधळा आहेस का ' अशी शिवी देतो अशी कित्येक  वास्तववादी उदाहरणे ऐकून माझ्या डोळ्यातून अचानक घळाघळा पाणी वाहू लागले.. एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमी असेल तर त्यांना लोकं हसतात का हे समजत नाही..  मला स्वतःला कानाचा थोडा त्रास आहे, लहानपणी खूप सर्दी व्हायची तेव्हापासून.. त्यामुळे टीव्ही मालिकांमध्ये जेव्हा ऐकू कमी येणाऱ्याबद्दल जोक्स केले जातात तेव्हा मला खूप वाईट वाटते.. आंधळ्याप्रमाणे बहिरा हापण शब्द शिवी किंवा चेष्टा मस्करी करण्यासाठी वापरले जाते.. ते जे बोलत होते ते मला अगदी नीट समजत होते.. कारण मलाही असे थोडेफार अनुभव आलेले आहेत.. ज्याने आयुष्यात काही सोसले आहे तोच इतरांचे दुख हाल समजू शकतो,बाकीच्या लोकांना काय समजणार!  रडू आल्यावर मला वाटले हे काय मला काय होतंय असं पण मग आजूबाजूला सगळ्यांचेच डोळे ओले आहेत ,अगदी व्यासपीठावरील सर्वांचे देखील असे दिसले.. सत्य कटू असते,पचवायला अवघड असते..  बोलता बोलता त्यांनी एक हृदयाला भिडणारा अनुभव सांगितला.. एकदा ते त्यांच्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेले होते.. त्यांना डोसा आवडूनही ते कधीच घेत नाही हि गोष्ट मित्रांना समजली होती म्हणून मित्रांनी मुद्दाउन सर्वांसाठी डोसा मागवला.. तर जैन सर म्हणले मला कट्या चमच्याने खाता येणार नाही अन मला डोसा हाताने खायचा नाही.. हे ऐकून त्यांच्या सर्व मित्रांनी डोसा हाताने खायला सुरुवात केली.. या उदाहरणातून त्यांना असे सांगायचे होते कि दृष्टिहीन व्यक्तींना अशा चांगल्या मित्रमंडळींची आवश्यकता आहे..

नंतर पारितोषक वितरण झाले.. सर्व विजेतांच्या घरची मंडळी अन स्नेही त्यांच्या कौतुकासाठी उपस्थित होते. त्यानंतर प्रत्येक विजेत्यांनी आपले आपले मनोगत मांडले.. मला आश्चर्य वाटले कि उद्या मला पुढे जाऊन सर्वांसोबत बोलायला सांगितले तर मी इतकी सुंदर व्यवस्थित बोलू शकणार नाही जितके हि सर्व मंडळी उत्तम पणे बोलली.. त्यांच्यातल्या आत्मविश्वासाला मी मनातून मनाचा मुजरा केला.. आपण जे क्षण भोगतो, अनुभवतो ते आपल्या पद्धतीने आपल्या विचारून मांडायला मिळाल्याने आणि त्याची दाखल घेऊन इतके कौतुक झाल्याने सर्व जण खूप खुश आणि समाधानी वाटत होते. प्रत्येकजणच  आपल्या आपल्या कथेबद्दल, त्यासाठी सहकार्य केलेल्या त्यांच्या सोबत्यांबद्दल अन या स्पर्धेबद्दल भरभरून बोलले.. ते ऐकता ऐकता पुन्हा पुन्हा डोळे भरून येत होते.. त्या सर्वांचे वाचन , अभ्यास , माहिती, गंमती जंमती  हे सर्व एकून मी स्तिमित होत होते..

एकांश संस्था नुसते पारितोषिक देऊन थांबणार नाही तर या कथांचे  करून  रेकॉर्डिंग  करायचा त्यांचा मानस आहे.. त्यासाठी एका ग्रुपच्या वतीने रेकॉर्ड केलेली एक कथा सर्वांना ऐकवली गेली.. ते ऐकताना चित्र जसेच्या तसे समोर उभा राहत होते.. ते ऐकून हा उपक्रम पुढे छान होणार आहे याची सर्वांना कल्पना आली..

कार्यक्रमानंतर अंजली ताई म्हणल्या कसा वाटला, मी म्हणले मला फार बरं वाटतंय आज मी इथे आले, खूप प्रेरणा मिळाली,मलाही तुमच्या सोबत काम करायला खूप आवडेल.. मग त्यांनी लगेच अनिता म्याडमशी माझी ओळख करून दिली.. बघूया आता पुढे माझ्या बाजूने मी करता येईल तेव्हढे काम नक्की करेन..  कोथरूड मधील अंधशाळेतील कौशल्या या कन्येला  उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले म्हणून तिच्यासोबत तिच्या शाळेतील बाई आणि काही विद्यार्थिनी आल्या होत्या. मी त्यांच्याशी थोडे बोलले.. त्या बाईंना म्हणले माझ्याकडून काही करता येण्यासारखे असेल तर मला सांगा.. त्या म्हणले आमच्या शाळेत येना कधीही मग आपण सविस्तरपणे बोलू. मी ठीक आहे म्हणले.. आता एका शनिवारी मी शाळेत जाऊन येईन, पाहूया चांगली संधी मिळणे हाही एक नशिबाचा भाग असतोना.. असे चांगले काम मिळण्याची प्रेरणा मिळावी, संधी लाभावी, हा जन्म सत्कर्मासाठी कारणी लागावा  अशी परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना!!