बुधवार, २९ जून, २०११

मंतरलेले दिवस - ३० : १०

कैलास पर्वत - मानस सरोवर यात्रा : जिवंतपणी स्वर्गानुभव

Day 10: 14th June,11

Manas Sarovar -> Driaphuk (4,890 mts)



आता हे ३ दिवस यात्रेतले सर्वात महत्वाचे होते.. पहाटे लवकर उठून अष्टपाद ,नंदी पर्वत,शेरलुग   गुफा इथे जायचे आणि नंतर मग परिक्रमेला सुरूवात करायची असा प्लान ठरला होता.. काल  संध्याकाळी यासंबंधित सूचना दिल्या गेल्या होत्या..कोणाला घोडा करायचाय,कोणाला पोर्टर पाहिजे विचारण्यात आले आणि तसे कालच बुकिंग केले गेले.. आधीतर जवळजवळ सगळेच जण परिक्रमा चालत करायच्या तयारीत होते..  पण भीम भय्या आणि महेश सर्वाना म्हणत होते इतक्या उंचीवर चालणे तुम्हाला वाटते तेव्हढे सोपे  नाहीये.. मग बरेच जण म्हणले आम्ही केदारनाथ, अमरनाथ चालत गेलो होतो  तर महेश म्हणला ते वेगळं, इथे १९००० फुटा वर  दोन पावले चालले तरी दमायला होते.. हो नाही करत काहींनी  घोडा करायचा ठरवला..
आमच्या पैकी ३/४  काका  भारी ट्रेकर्स होते.. लोहगावकर काका तर नुकतेच अन्नपूर्णा ट्रेक करून  थेट काठमांडूला कैलास मानस यात्रे साठी आले होते..  हे असे थोडे जण आणि मी चालत जाण्याच्या निर्णयावर अगदी ठाम होतो..  महेश मुंबईचा असल्याने त्याला मी सह्याद्रित  मी ट्रेकिंग केलाय हे सांगितल्यावर तो मला घोडा कर असा अजिबात म्हणला  नाही.. पण भीम भय्या मात्रा माझ्याही मागे लागला घोडा कर म्हणून.. कदाचित  तो काठमांडूचा असल्याने सह्याद्री काय प्रकार आहे  हे त्याला  माहिती नसावं किंवा  एक मुलगी म्हणून त्याचा माझ्यावर विश्वास नव्हता..
आणि ते घोडा करण्यासाठी सर्वांच्या इतके मागे लागले होतेकी त्याना नक्की कमिशन मिळणार असेल असं आम्हा सर्वाना वाटले.. त्याने मला बरेचदा सांगून पहिले  पण मी हट्टी, माझ्या  मनाने एकदा ठरवला ना  चालत जायचं  मग चालतच जाणार.. हट्टापेक्षा खरतर मला तेव्हाढ आत्मविश्वास होता.. या वयात नाहीतर मग कधी चालणार,कधी ट्रेकिंग करणार? आमच्या ग्रूप मध्ये अजुन दोन IT मधे काम करणारे होते, माझ्याहून वयाने थोडे लहान..  त्याना ट्रेकिंग मध्ये जास्त रस नव्हता, ते दोघं त्यानच्या भारी कॅमरा मधून  एक से एक फोटो काढत होते..  हे दोन तरुण सुधा घोड्याने जाणार होते म्हणून मलाही जा म्हणत होते पण मी इथे येताना चालतच परीक्रमा पूर्णा करणार ठरवून आले होते..
आता आम्हाला सॅक मधे ३ दिवस लागणारे आवश्यक तेव्हाढच समान घ्यायचे होते..  बाकी समान आता परीक्रमे नंतरच मिळणार होते..
घोड्यावर सॅक घेऊन बसायला परवानगी नव्हती.. बिजनेस वाढवण्याकरता बाकी काही नाही..
त्या लोकांना या २/३ महिन्यातच पैसे मिळतात एरवी सगळं बंद असतं ना.. म्हणून सामनासाठी  वेगळा पोर्टर  करावा लागत होता..  पोर्टर म्हणजे तिबेटीयन माणूस आपले समान घेऊन सोबत येणार..  पोर्टर नसेल  करायचा तर कमीत कमी समान जर्किनच्या खिशात ठेवा असे सांगितले गेले..  चालणार्‍या काही जणांनी सुधा ओझे नको म्हणून पोर्टर बुक केला.. त्यांचं ठीक होता ते सगळे जेष्ठ नागरिक होतेना.. मी मात्र माझं समान स्वतः स्याक मधून घायचे ठरवले,पोर्टर वगैरे काही केला नाही मी..
माहितीसाठी सांगते ३ दिवसाचे मिळून घोड्याचे १३०० युवान आणि पोर्टरचे ४०० युवान असे दर होते.. १ युवान = साधारण ७ रुपये
३ दिवस आता माझ्यासोबत स्याक मध्ये पाणी, १ न्यापकीन, गोळ्या,बिस्किट्स, ड्राय फ्रुट्स, औषधे, ग्लुकोज, कॅमेरा, टोर्च, पोचू आणि अंगावर थार्माल्स, स्वेटर , जर्किन, हातमोजे, पायमोजे, स्कार्फ, माकड टोपी हे सगळं होता..  आता आमचा प्रवास अष्टपाद ,नंदी पर्वत,शेरलुंग गुफा दिशेकडे सुरु झाला.. इकडे जाण्यासाठी वेगळे १०० युवान द्यावे लागले.. कारण हा भाग उंचीवर आहे (४९०० mt) तिथे चालत जाता येत नाही आणि हि गुफा चायना गव्हर्मेंट च्या कार्यक्रमात येत नाही म्हणे असं आम्हाला काहीतरी सांगण्यात आले..
हा रस्ता थोडा बिकट होता..  एके ठिकाणी सगळ्या गाड्या थांबल्या आणि आता इथून पुढे १ km चालायचे होते.. दुहेरी पर्वतांच्या रंग, शेजारी खेळत खेळत जाणारी नदी.. सगळा बर्फाचा रस्ता.. आताशा हिमालयातला ट्रेक खऱ्या अर्थाने सुरु झाला होता.. माझे शूज बर्फावर घसरतात का मी तपासून पहिले पण काही झाले नाही.. थोडासा चढ होता ,बाकी रस्ता तसा प्लेन होता.. त्यामुळे विशेष काही जाणवले नाही.. सगळ्यात आधी आम्ही ४/५ जण एका point वर पोहचलो तिथून कैलास आणि नंदी पर्वताचे अप्रतिम दर्शन झाले..  महादेवाच्या मंदिरात जसे पिंड आणि समोर नंदी असतो अगदी तसंच या पर्वतांची ठेवण आहे..
आणि इतके दिवस मीतरी असं ऐकलं होतं कि  कैलास पर्वत हे शंकर पर्वतींचे निवास स्थान आहे पण खरंतर इथे सगळे म्हणतात कि कैलास पर्वत म्हणजे खुद्द भोळ्या शंकराचे रूप आहे.. तुमचा विश्वास बसणार नाही पण इथून कैलास पर्वत खूप जवळून दिसत होता, त्यावर एका बाजूला २ डोळे आणि वरती तिसरा उभा डोळा इतका स्पष्टपणे दिसतो कि आमचा आवाज बंद झाला.. आणि जटापण ठळकपणे दिसतात..  एकाबाजूला ओम दिसतो.. साक्षात श्री शंकराचे नंदीसोबत सुदर्शन झाल्यावर या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले.. हा  निसर्गाचा चमत्कार का परमेश्वराची लीला समजत नाही..  कैलास पर्वत विश्वाच्या मध्यभागी आहे. त्यास मेरू पर्वत म्हणतात. 
इथून जवळच शेरलुंग गुफा - Monastery  आहे..  तिथे तिबेटी लोकांची बरीच गर्दी होती.. जवळच अष्टपाद पर्वत हे जैन धर्माचे प्रथम र्तीथकर ऋषभनाथांच निर्वाणस्थळ. आठ पावलं चढून ते कैलासात विलीन झाले म्हणून अष्टपाद पर्वत नाव दिले.. आज परिक्रमा सुरु करायची होती त्यामुळे इथे जास्त वेळ न रेंगाळता पुन्हा गाड्यांच्या दिशेने चालू लागलो.. मला नंतर कळलं कि इथे एका काकुना बराच त्रास झाला, ऑक्सिजन लावावे लागले..
आता दार्चेन वरून आम्ही बेस  कॅम्प कडे गाडीने निघालो.. मानस सरोवराच्या परिसरात फोन ची सोय नव्हती आणि चार्जिंगची सोय होती.. आणि आता इथून पुढे २/३ दिवस फोन/चार्जिंग कसल्याच सोयी मिळणार नव्हत्या त्यामुळे दार्चेनला खास फोन करण्यासाठी गाड्या थांबवल्या गेल्या.. आई बाबांशी बोलले,परीक्रमेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.. इथे आम्ही सर्वांनी  परीक्रमेसाठी काठ्या घेतल्या.. लाकडाच्या स्वस्त होय बर्याच जननी त्या घेतल्या पण मी फोल्डिंग वाली चांगली घेतली.. पुढेमागे अजून ट्रेकिंगला गेले कुठे तर नक्की उपयोग होईल म्हणून..
आता कैलासाची परिक्रमा सुरु झाली.. एकूण अंतर ५२ km आहे.. त्यापैकी १२क्म दारचेनहून तारपोचेपर्यंत १२ कि.मी. अंतर हे गाडीने जातात.. इथे यमद्वार अशी एक पवित्र जागा आहे.. इथल्या कमानीत जाऊन घंटा  वाजवून उजव्या बाजूने प्रदक्षिणा मारायची.. या द्वारातून प्रवेश केल्यावर अकाली अस्वाभाविक मृत्यू येत नाही, अशी श्रद्धा आहे..
सकाळचे ११ वाजत आले होते.. इथून थोडंसं पुढे आलो तिथे मोकळ्या जागेवर जेवणाची व्यवस्था शेर्पानी आधीच करून ठेवली होती..  जेवताना चक्क एका शेर्पाला चक्कर आली आणि तो बेशुध्द पडला.. आम्हाला फार कसेतरी झाले.. हे शेरपा  लोक आमच्यासाठी स्वतःकडे लक्ष न देता दिवसरात्र राबत होते.. तो जागा झाला तेव्हा त्याला बराच वेळ समजत नव्हतं आपण कुठे आहोत ते.. तो प्रकार बघून सगळेच थोडे घाबरून गेले.. त्याच ठिकाणी अजून थोड्या जणांना उंचीमुळे श्वास घ्याला त्रास होऊ लागला..  मग तो शेरपा आणि आमच्यापैकी ६ जण गाडीत बसून दार्चेन मुक्कामासाठी परतले.. हे लोकं पुढे परिक्रमेला येऊ शकले नाही.. आता इथे घोडेवाले आणि पोर्टर आले होते.. इथून चालत/घोड्याने खऱ्या अर्थाने परिक्रमा सुरु करयची होती.. आम्ही चालत जाणारे लोक सगळ्यांच्या निघालो.. निघताना केळकर काका म्हणले सावकाश हळूहळू जा, baby steps ने चालायचे.. दम लागला कि थांबायचं.. त्या काकांनी याआधी ७ वेळा परिक्रमा केली आहे.. त्यांचे अनुभवाचे बोल.. नकळत मी त्यांच्या पाया पडले,त्यांचे आशीर्वाद घेतले आणि चालायला लागले.. परिक्रमा सुरु करताना मला कोण जाणे फार आनंद होत होता.. ज्याची इतके दिवस तन्मयतेने वाट बघत होते तो क्षण हा.. समोर पर्वतांच्या मधून नदीच्या शेजारून रस्ता जात होता तिथून जायचे होते, 12km ..
तसे आम्ही चालणारे एकावेळेस निघालो पण प्रत्येकजण आपल्या आपल्या वेगाने निसर्गाचा आनंद घेत जात होता.. सुरुवातीलाच बिहार हून आलेल्या मुन्ना भाईशी भेट झाली... ते आणि त्यांचे मित्र थेट  ABC adv ग्रुप कडून आमच्यासोबत यात्रेला आले होते.. मी एकटी कशी काय आले वगीरे त्यांनी मला विचारले आणि इथून जे सुरु झाले ते परिक्रमा संपेपर्यंत मला बहिण मानून  सोबत दिली.. एक मुलगी म्हणून मला एकटीला जाऊन  दिले नाही त्यांनी.. तशी मला कुठेच घाई केली नाही, एक ठराविक अंतर सोडून माझ्यासाठी ते नेहमी थांबायचे.. आणि एक मुलगी असूनही मी  या ३ दिवसात कधीच कोणाचा आधार घेतला नाही , हात धरला नाही.. माझी मी स्वतंत्रपणे चालत राहिले  याचं मला समाधान आहे.. आम्ही ठरवलंच होतं सुरुवातीला.. आपली काही इथे कोणाशी स्पर्धा नाही.. परिक्रमा पूर्ण करायचं आपलं ध्येय.. त्यामुळे सावकाश ब्रेक घेत फोटो काढत एन्जोय करत देवाचे नाव घेत  चालायचं..
दुपार असली तरी कोवळं उन्ह होतं, चालत असल्याने विशेष थंडी जाणवत नव्हती.. नजरेत येणाऱ्या प्रत्येक पर्वताची ठेवण वेगळीच होती असं जाणवत होते.. कुठूनतरी एखादा धबाबा जोरात कोसळताना दिसायचा.. कुठे बर्फ वळून गाडी झालेली दिसायची.. नदीचा खळखळ आवाज सतत साथ देत होता.. घोड्यावाल्यांचा तोच मार्ग असल्याने मध्ये अधे घोडे आले कि आम्ही चालणार कडेला व्हायचो..
रस्ता साधा सरळ होता, क़्वचित कुठेतरी चढ लागायचं.. पण इथे खरंच दम लगेच लागायचा.. आपल्या इथे जर २० पावले चालून दम लागत असेल तर इथे १० पावले चालले कि लगेच ब्रेक घ्यावा लागायचा.. पण अख्या १२ km  मध्ये चालताना मी एकदाही कुठे बसून विश्रांती घेतली नाही.. दम लागला कि काठीवर आधार देऊन वाकून उभे राहायचे.. श्वासोस्वास नॉर्मल झाला कि मग पुन्हा चालायला लागायचे.. orange, lemon  च्या गोळ्या सोबत होत्याच त्या चघळत जायचे..
बाकी मग मुन्ना भय्याची पूर्ण वेळ बडबड चालू होती.. ते भयंकर jolly .. त्यांनी त्यांच्या घरात कोण कोण असतं, मग त्यांचा बिजनेस त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कसा सुरु केला आणि आता त्यांचं किती नाव झालंय.. मग त्यांचं love  marriage कसं झालं या सगळ्या गंमती जमती सविस्तरपणे सांगितल्या..  मी त्यांचा ऐकत होते पण जास्त बोलत नव्हते.. बोलल्यावर लगेच दम लागतोना..  त्यांची साई बाबांवर आणि शंकरावर नितांत श्रद्धा आहे हे मला खूप जाणवलं..   कोणी कुठे म्हणलं कि अजून किती चालायचं किवा कोणाला दम लागला कि मुन्ना भय्या त्यांना म्हणयचे तिकडे कैलासाकडे पहा , ओम नमः शिवाय म्हणा, तो आपली काळजी घेईल, आपल्या शेवटपर्यंत सुखरूप पोहोचवेल.. आज १२ km  पूर्णवेळ उजवीकडे कैलासाचे शिखर दिसत होते ते बघतच आम्ही चालत होतो.. कैलासाचा हा सहवास मिळत होता ते क्षण  विलोभनीय अविस्मरणीय  होते, आहेत.. 
असेच चालत चालत मध्ये एक टेन्ट वजा हॉटेल लागले.. मला वाटला निम्मा अंतर झाले असेल तर तिथे कळलं ९ km  झाले आता फक्त ३ km  राहिले तर खरचं वाटलं नाही.. एव्हढे आपण चाललो यावर विश्वास बसतच नव्ह्ता..  खरंतर एव्हढ्या थंड हवेच्या ठिकाणी चहा मिळायलाच हवा होता.. पण छे, चहाचा पत्ता नव्ह्ता तिकडे.. उलटं तिबेटी/चीनी लोकं तिथे हॉटेल मध्ये बिअर वगैरे जास्त घेताना दिसले.. आमची बरीच मंडळी तिथे जमली होती.. स्याक काढून जरावेळ बसले, बिस्किट्स खळे, ग्लुकोज प्यायले आणि लगेचच माही निघालो..
आता सकाळ पासूनच्या प्रवासाने थोडे दमल्यासारखे वाटत होते.. शेवटचा टप्पा नेहमीच मोठा आणि अवघड वाटतो तसे हे शेवटचे 3km  जास्त वाटले.. सगळ्यांना उत्साह यावा म्हणून मुन्ना भाई मध्येच भक्ती गीते पण कॉमेडी सुरात शब्दात म्हणत होते.. त्यांचा उत्साह कधीच कमी झालं नाही याचं मला खूप आश्चर्य वाटलं..
शेरपा लोकं आमच्या मागून निघून बरच समान घेऊन आमच्या पुढे निघून जात होते.. बाकी आमचं  जेवणाचं आणि टेन्टचे समान याकवरून पुढे गेले होते.. साधारण ४ वाजता मी १२ km  चालून डेराफूकला पोहचले.. समोर कैलास पर्वत जवळ भासत होता.. अन दगडातून वाहणारी फेसाळती नदी आणि नदीच्या शेजारी आमचे टेन्ट.. मी गेले तेव्हा शेरपा टेन्ट उभारत  होते.. ते होईपर्यंत सगळ्यांना एका मोठ्या टेन्ट मध्ये बसायची व्यवस्था केली होती.. तिथे मी गेले अन आत पहिले तर सगळ्या काकू ज्या घोड्यावरून आल्या होत्या त्या दमून बसल्या होत्या.. घोड्याने येणं अजिबात सोपं नाहीये,सर्वांचे गुडघे मांड्या दुखत होत्या.. माझे मात्र पाय वगैरे काहीही दुखत नव्हते ..  सगळ्यांनी आलीस का चालत,दमलीस का वगैरे मला विचारले.. लगेचच चहा आला.. चहा घेताना इकडे तिकडे बघत होते तोपर्यंत हिमवर्षाव सुरु झालं आणि मग भयानक थंडी जाणवू लागली... नंतर भीम भय्या, महेश, केळकर काका हे मला भेटायला आले,कसा अनुभव होता विचारले..
एका टेन्ट मध्ये दोघांची झोपायची व्यवस्था होती.. केळकर काकांनी माझी सोय पुण्याच्या सिमास  ग्रुपमध्ये स्मृती वाघ या काकुंसोबत केली.. आम्ही म्हणलं वाघ आणि पंचावाघांना एका गुहेत ठेवत आहात तुम्ही.. आमचं टेन्ट पण  कडेला होता सर्वांच रक्षण करण्यासाठी.. हाहाहा..  स्मृती काकुंशी पहिल्यांदाच ओळख झाली माझी.. त्यांनी माझी सगळी विचारपूस केली, चालत आल्याबद्दल कौतुक केले.. आता बर्फ पडतोय बाहेर तर आपण जेवायला बाहेर कसे जाणार म्हणेपर्यंत आम्हाला टेन्ट मध्येच सूप आणि त्यांनंतर गरमागरम खिचडी देण्यात आली हे जेवण पूर्ण यात्रेतील बेस्ट जेवण होते.. उद्या पहाटे लवकर निघायचे होते त्यामुळे लगेच diamox  गोळी देऊन झोपायला सांगितले.. आज जास्ती उंचीवर असल्याने गोळीचा पूर्ण डोस दिला होता.. लगेचच आम्ही स्लीपिंग ब्याग मध्ये शिरलो.. स्मृती काकू झोपताना म्हणल्या इथे पर्वतांमध्ये आपण आहोत, साप वगैरे तर यायचा नाही ना इथे.. मला हसू आले.. त्यांना म्हणलं माझ्या मनात हा विचार बिलकुल आला नाही.. :) बिनधास्त झोपा काकू,समोर कैलास आहेत आपल्या मग कशाला घाबरायचे!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: