बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

मंतरलेले दिवस - ६७

त्या मावशी..
त्या दिवशी जरा हळू हळू सावकाश कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीने मी चालत होते.. पण शेवटी बागेत काम करणाऱ्या मावशींनी विचारले.. काय हो म्याडम, काय झालं.. मी हसून पहिले त्यांच्याकडे आणि मान हलवून काही नाही असे म्हणले.. कोण कुठल्या त्या पण किती लक्ष त्यांचं माझ्याकडे.. आम्ही मागे एकदा या बागेतल्या आणि हाउसकीपिंग स्टाफला पार्टी दिली होती बास, तेव्हापासून रोज इकडे तिकडे जाता येता हे लोक आवर्जून विचारपूस करतात.. आणि आज मला कळले कि ते मनापासून विचारतात, औपचरिकता मुळीच नसते त्यात..  कालच वाढदिवस झाला अन आज लगेच वय वाढल्याच्या खुणा दिसू लागल्या कि काय असे वाटू लागले.. एरवी कॅम्पस  मध्ये फुलपाखरासारखी बागडणारी मी आज एका बिल्डींगमधून दुसऱ्या ठिकाणी जायलाही आढेवेढे घेत होते पण मिटींग्स साठी जाणे अपरिहार्य होते.. आणि आणि शेवटी जे नको व्हायला हवे होते.. मला असं काही झालंय हे कोणाला सांगायचं नव्हते कारण शेवटी माझ्या इमेजचा प्रश्न होता.. :)

ती काठी..
मार्च मधे आम्ही कात्रज - सिंहगड ट्रेक केला होता तेव्हा माझी काठी एका मैत्रिनीकडे राहिली होती.. त्याला आता किती दिवस झाले.. पण आजच नेमकी तिने मला आणून दिली.. आणि संध्याकाळी त्या काठीचा मला खरा खरा उपयोग झाला कारण मला एकेक पाऊल टाकताना आधराची गरज वाटत होती.. हातात काठी बघून सिक्यूरिटीवाल्यांनी आवर्जून चौकशी केली.. मला मात्र अवघडल्यासारखे वाटत होते..

ती मैत्रीण..
दिवसभर दुर्लक्ष केलं, अंगावर काढलं.. संध्याकाळी कॉलसाठी थांबावं लागलं..  माझी बिल्डींग बस थांब्यापासून थोडी लांब.. हातात काठी त्यात पाऊस.. तेव्हा ती  सोबत आली.. तिची आणि माझी तशी नवीन ओळख.. तरीही तिने मदत केली.. गरज लागेल तिथे आधार दिला.. हल्ली कोण कोणासाठी करतं इतकं.. ज्याला त्याला आपापले व्याप असतातना.. बस येईपर्यंत ती माझ्यासाठी थांबली होती..


तो रिक्षावाला..
ट्राफिक मुळे घरी जायला बराच उशीर झाला.. स्टोप  आल्यावर उतरण्यासाठी उठले तर काय मला चालताच येत नव्हते.. बाजूला धरत कशीबशी उतरले अन घरी फोन केला.. बाबा घरी नव्हते त्यामुळे घायला कोणी येऊ शकणार नाही असे कळले.. मग कधी नव्हे ते मी  मोर्चा रिक्षावाल्यांकडे फिरवला. ते स्त्याण्ड वरचे रिक्षावाले खूप आगाऊपने वागतात त्यामुळे मी एरवी त्यांच्याकडे चुकूनही बघत नाही.. पण आज त्यांनाही माझी हालत बघून दया आली.. कारण माझ्यात  एकेक पाऊल टाकण्याइतकाही आत्मविश्वास राहिला नव्हता..  रिक्षेत बसून रडत आईला सांगितले.. वृंदाने रिक्षा केली यावरूनच आईला प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली..  मी घरापाशी  उतरताना आई म्हणली मी कुलूप लावून येते, आपण त्याच रिक्षेने डॉक्टर कडे जाऊ.. मला त्या रिक्षावाल्यांची नाटके माहिती आहे त्यामुळे आईला म्हणले नको त्यांना थांबावे लागेल, बाबा आल्यावर मी जाईन नंतर.. तर तो रिक्षावाला चक्क म्हणला काही हरकत नाही, मी थांबतो.. त्याने डॉक्टरकडे सोडले तेही वेगळे पैसे न घेता.. शेवटी माणुसकी म्हणतात ती हीच..


ते डॉक्टर..
डॉक्टर मात्र कुल होते.. काहीतरी जड वस्तू विचित्र पद्धतीने उचलल्यामुळे किंवा अशाच काही कारणाने तुझी कंबर दुखत आहे असे ते म्हणले.. थोडे व्यायाम सांगितले आणि औषधे दिली.. मी म्हणले आईला सांगा हे ट्रेकिंग मुळे नाही झाले नाहीतर माझा ट्रेकिंग बंद करतील ते.. कारण आमच्याकडे मला काही झाले कि बाबा माझ्या भटकंतीवर आणि पाणीपुरीवर येतात..
डॉक्टर हसत म्हणले नाही नाही त्यांचा काही संबंध नाही.. उलट तुझी बॉडी एकदम  फ्लेक्जीबल आहे ट्रेकिंग मुळे.. मग मी म्हणले माझ्यासारख्या इतक्या फिरणाऱ्या मुलीला असे का व्हावे.. ते म्हणले काहीतरी चुकीच्या पद्धतीने उचललं असेल, वाकली असशील  किवा विटामिनची कमतरता झाली असेल,काळजीचे कारण नाही..



ती रात्र..

त्या रात्री मला जाणवले कि आपण किती पराधीन आहोत.. आज धडधाकट असलो तरी उद्याचे कोणाला माहिती.. शरीराच्या कोणत्याही एका अवयवात साधी कळ आली तरी आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.. त्या रात्री मला माझ्याकडे आहे त्याची खऱ्या अर्थाने किंमत समजली.. देवाकडे प्रार्थना करत होते मी कि हे काय चालू आहे सगळे, आज भटकंतीमधेच काय तो मला आनंद वाटतो, तो माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस.. मी आजपर्यंत शुल्लक गोष्टींसाठी रडले त्याबद्दल मला माफ कर.. त्या रात्री मला खूप रडू आले.. कदाचित काहीवेळे तो भगवंत आपल्याला रडायला लावून आपले गच्च भरलेले मन मोकळे करून घेतो कारण तेही महत्वाचे असते..

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला आजच्या या दिवसात कितीजणांनी मदत केली त्यांचे मी मनातल्या मनात आभार मानले.. म्हणतातना अशावेळेसच लोकांची पारख होत असते.. मी नशीबवान आहे या बाबतीत.. भगवंताने साऱ्या सृष्टीवर माझा भार सोपवलाय असा विचार मनाला स्पर्शून गेला!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: