गुरुवार, ८ मार्च, २०१२

मंतरलेले दिवस - ५८

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे - श्री स्वामी समर्थ

असंच गप्पा मारता मारता एक मैत्रीण सांगत होती "हल्ली माझे ग्रह बदलले आहेत.. माझं काही चांगले व्हायला लागले की काहीतरी गडबड होत आहे आणि मग काही भलतच काही घडते.. कोणाची तरी वाईट नजर लागली आहे.. दोन तीन ठिकाणी पत्रिका दाखवली तर ते तसंच म्हणले की कोणीतरी ब्लॅक मॅजिक केली आहे.. मला तर वाटते माझ्या काही नातलगांची अशी नजर लागली असणार.. त्यांना मी जेव्हा काही सांगते तेव्हा लगेच दुसर्या दिवशी विपरीत घडते.. बर आता पुढे काय करावे समजत नाही.. ज्योतिशींनी अघोरी उपाय सांगितले जसे की मध्यरात्री कुठेतरी जाऊन काहीतरी करायचे जे खरेतर शक्य नाही.. मी काय करू.. "

खरतर अशावेळी ज्यांचे सगळे सुरळीत चालू आहे त्यांनी सल्ले द्यावेत.. मी तर पामर आहे, मी काय तिला सांगणार.. पण कसे काय माहिती नाही पण अगदी सहजपणे मी तिला म्हणले "अगं तू रोज एका चांगल्या ग्रंथाचे वाचन सुरू कर.. मी दासबोध वाचलाय  म्हणून तो ग्रंथ ,किवा सध्या जे ग्रंथ मी वाचत आहे तेच वाच असे मी नाही म्हणत.. तुझी ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्यांचा ग्रंथ वाच.. रोज एक पान का होईना वेळ काढून वाच.. त्यामुळे आपले आपल्या नकळत वाईट गोष्टींपासून सरंक्षण होते.. त्या ग्रंथामधून येणार्‍या शुभस्पंदनांचा आपणास लाभ होतो.. "    तिला ते फार मनापासून पटले आणि तिने ग्रंथ वाचण्याचा निश्चय केला.

खरंच आयुष्याचा प्रवास किती बिकट आहे.. चालता चालता कुठे चाललोय हे समजत नाही आणि कधी कधी कुठे जायचय हेही कळेनासे होते.. मला वाटते त्यांना सगळे मिळाले,त्यांना वाटते मी नशीबवान आहे..  एक मिळाले की सुखी होऊ असे आधी वाटते, मग ते मिळाल्यावर अजुन दुसरे काही मिळण्यावर आपले सुख अवलंबुन राहते.. या सगळ्या खेळात कधी कधी बास,आता थांबावे असे वाटू लागते.. तेव्हा या ग्रंथांचा फार आधार मिळतो.. मी जवळ जवळ २००९ पासून ग्रंथ वाचन सुरू केले.. किती खुश असले किंवा दुखी असले तरी रोज एकेक पान किंवा श्लोक वाचत गेले.. त्यातले किती समजले किंवा आचरणात आणता आले हा भाग वेगळा.. पण कमीतकमी चांगल्या दिशेने प्रयत्न तरी सुरू केले.. व्यावहारिक दृष्ट्या पहिले तर ग्रंथ वाचल्याने माझ्या आयुष्यात काही भारी गोष्टी घडल्या नाही पण कितीतरी वाईट गोष्टींपासून माझा  नक्कीच बचाव झाला असणार हे शंभर टक्के खरे..  आपण सुदैवाने इतक्या चांगल्या संस्कृतीत जन्माला आलोय की आयुष्यभर वाचत राहिलो तरी पुढे कधी 'आता काय वाचायचे' असा प्रश्न मुळी पडणारच नाही इतकी ग्रंथ संपदा उपलब्ध आहे.. चांगल्या ग्रंथाचे वाचन आपण नियमीत केले तर कोणाच्याही वाईट नजरेची आपल्यापर्यंत पोहचायची हिंमतसुद्धा होणार नाही असा माझा दृढ विश्वास आहे!

असे म्हणतातना  'स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्!'  If you follow this knowledge even to a small extent you will be free of the greatest of fears. No fear will touch you. :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: