सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३९

वाऱ्याचा किल्ला.. रोहीडा..

या पावसाळ्यातली भटकंती पूर्ण झाली असं नुकतंच मी जाहीर केलं होतं.. पण सिमेंटच्या जंगलात कितीही व्यस्त असले तरी हा रिमझिम पाऊस मला बिलकुल स्वस्थ बसून देत नाही.. :) निमित्त होतं सह्यात्रीचं.. ट्रेकर्स मित्रांनी मिळून सह्याद्रीमध्ये भटकंतीचा, गिर्यारोहणाचा आनंद घेण्यासाठी एक नवीन संस्था सुरु केली ही बातमी माझ्या कानावर येऊन पडली.. नोकरी, घर संसार सांभाळून हा आगळा उपक्रम सुरु करत आहेत हे ऐकून मला त्यांचं (ध्रुव, सिद्धार्थ , सागर आणि पराग ) विशेष कौतुक वाटलं.. सह्याद्रीचा आणि हिमालयाचा दर्जेदार अनुभव पाठीशी असलेल्या या ट्रेकर्ससोबत मी याधीही ट्रेक्स केले असल्याने माझा पूर्ण विश्वास आहे.. सह्यात्रीचं पाहिलं लक्ष किल्ले रोहीडा हे होतं.. सिद्धार्थ आणि सागर यांनी या ट्रेकची जबाबदारी उचलली..

खरंतर रोहिड्याला पूर्वी मी गेले होते पण सह्याद्रीतले हे गड किल्ले १० वेळा जरी बघितले तरी पाहू तेव्हढे कमीच आहे, प्रत्येक वेळेसचा तिथला अनुभव हा नवीनच असतो.. आणि योगायोगाने माझ्या ट्रेकिंगच्या जुन्या मैत्रिणीही या ट्रेकसाठी उत्सुक होत्या.. मग काय मोका भी है दस्तूर भी है..

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी ६ वाजता सगळे  स प महाविद्यालयाच्या दारापाशी जमा होऊ लागले.. गम्मत अशी की यंदा ट्रेकला मुलीच जास्त होत्या.. एरवी मैत्रीणीना पटवता पटवता नाकी नऊ येतात.. सिद्धार्थ मेधावी ज्युतिका आरती नेहा मी एका गाडीत तर सागर संध्या श्रुती विशाखा श्रीनिवास हे सगळे दुसर्या गाडीतून असा आमचा प्रवास सुरु झाला.. पुण्यातच पाऊस बराच चालू होता त्यामुळे तिकडे किल्ल्यावर किती भारी असेल याची कल्पना येत होती.. पुणे सातारा महामार्ग लागला आणि सभोवताली हिरवाई दिसू लागली.. लगेचच नाश्त्यासाठी एकेठिकाणी थांबलो.. सकाळी एकदा व्यवस्थित पोटपूजा केली की मग पुढे भटकायला मोकळे..

पावसाळ्यात कुठेही जाताना जो प्रवास असतो तो मला जास्त भावतो.. हिरव्या रंगाच्या विविध छटा किती पाहून अन नको असं आम्हा सर्वांनाच होत होतं.. नंतर भोर घाटात एका पॉईन्टला थांबलो तिथे नदीचे  नागमोडी वळण फार सुंदर दिसत होते.. थोडे फोटोसेशन करून प्रवास पुन्हा सुरु झाला.. जुन्या ट्रेक्सच्या गम्मतीजम्मती, काही खास आठवणी यावर चर्चा करत भोर गावात कधी पोहचलो समजलेच नाही..

तिथून ७ किमी पुढे जाऊन रोहिड्याच्या पायथ्याशी पोहचलो.. पावसाची रेलचेल चालू होती.. स्याकमधले  काही भिजणार नाही अशी खात्री करून आम्ही गाड्यातून उतरलो.. मग ट्रेकरसिडने आणि सागरने आम्हाला किल्ल्याची माहिती दिली.. हे फार महत्वाचं आहे.. ट्रेकिंग म्हणजे नुसतचं पावसात जाऊन भिजणं ,वडापाव खाणं असं नाहीये.. तर त्या गडकिल्ल्यांची माहिती, इतिहासपण समजून घेणं हा ट्रेकिंगचा एक अविभाज्य घटक आहे.. रोहीडा हा विचित्रगड, बिनीचा किल्ला, वाऱ्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो.. या किल्ल्यावरून वेगवेगळ्या दिशेला  सिंहगड, पुरंदर, तोरणा, केंजळगड वगैरे किल्ल्यांचे दर्शन होते.. अर्थात आज तर समोर जवळच असलेला रोहीडा देखील स्पष्ट दिसत नव्हता एव्हढे ढग खाली आले होते.. वातावरण अतिशय उत्साहवर्धक होतं.. मन आपोआप प्रफुल्लीत होत होतं..

रोहीडा चढायला सोप्पा आहे असं अगदी खात्रीने मी मैत्रीणीना सांगितले होते आता नक्की काय ते कळेल असं म्हणत आम्ही गड चढू लागलो..  सर्वांनी शक्यतो एकत्र चला, ढगांमुळे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या.. पुढे रस्ता दाखवायला सागर आणि सगळ्यात मागे सिद्धार्थ आणि मध्ये आम्ही.. जिथे पाहावं तिथे हिरवळ आणि खाली उतरलेले ढग.. नकळत मनात "झूमकर पर्बतों पे घटा छा रही है.." गाण्याची ओळ डोकावून गेली.. काही ठिकाणी पावसामुळे थोडा चिख्खल होता पण दगडांमुळे चढणे सोपे जात होते..

आता इथे खरी मज्जा होती.. :) पूर्वी इथे आल्यामुळे मला आकर्षण वाटत होते ते इथल्या विविध फुलांचे आणि भन्नाट वाऱ्याचे.. खालपासुनच पाऊस, गार वारा चालूच होतां.. पण किल्ला चढताना एका विशिष्ठ टप्प्यात वाऱ्याचे ते रूप काय सांगावे.. काहीवेळा वाऱ्याबरोबर  मी आता उडून जाईन असं वाटून अक्षरशः खाली बसत होते.. ही अतिशयोक्ती नव्हे बरं.. इथे कोण कसं पडतंय हे बघून आम्ही सगळे मनापासून हसत होतो..

मध्ये मध्ये थांबत, तिथून दिसणाऱ्या विहंगम दृश्याचा आनंद घेत, छायाचित्रे टिपत रमत गमत आमची चढाई चालू होती.. साधारण १०.३० वाजता आम्ही पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो.. तिथे गणेशपट्टी आहे पण ठळकपणे दिसत नव्हती.. पुढे दुसऱ्या द्वारापाशी पाण्याची टाकी आहे,त्यामध्ये १२ महिने पाणी असतं म्हणे.. तिसर्या दगडी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना गजमुख आहेत आणि त्याखाली डावीकडे देवनागरी आणि उजवीकडे फारसी लिपीत शिलालेख आहेत.. त्याकाळात दळणवळणाच्या आणि इतर काही सोयी नसताना हे सगळं कसं केलं असेल हा प्रश्न मला प्रत्येक गडावरच पडतो..

इथे जवळच एक अर्धवर्तुळाकार बुरुज होतं.. सगळे जमल्यावर सागर आणि  सिद्धार्थने किल्ल्याचा नकाशा दाखवून कोणत्या दिशेला कुठे काय काय आहे याची माहिती सांगितली.. (मला जास्त आठवत नाहीये).. नंतर नेहमीप्रमाणे सिद्धार्थने घोषणा दिल्या आणि आम्ही त्याला प्रतिसाद दिला.. आमच्या \पैकी तिघी जणींना मराठी-संस्कृत समजत नव्हते.. त्यांनी कुतूहलाने घोषणांचा अर्थ विचारला तेव्हा या दोघांनी प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण दिले.. आम्हाला नुसता किल्ला चढून,घोषणा देऊन इतका आनंद होतो तर त्याकाळी शिवाजी महाराजांना, मावळ्यांना किल्ले जिंकून किती आनंद होत असेलना..

इथे वरती सुंदर फुलांचा गालीचा पसरला होतां आणि आम्ही ढगातून चालत होतो.. आता किल्ल्यावरचे वेगवेगळे बुरुज, टाकं वगैरे पाहत पाहत गड भ्रमंती चालू होती.. बुरुजांवरून खालची दरी अप्रतिम दिसत होती.. एकीकडे चुन्याच्या घाण्याचे एक मोठे चाक होते ते हलवण्याचे मुलांनी प्रयत्न केले.. पण ते जरा जास्तीच अवघड होते.. मध्ये एके ठिकाणी आमच्या साहसाची परीक्षा झाली.. दोन्हीकडे पाण्याची टाकं आणि मध्ये छोट्या दगडाच्या आधाराने पाय टाकायचा होतां.. अर्थात सह्यात्री मंडळीच्या आधाराने हे सहज शक्य झाला.. आणि ट्रेकचा आनंद द्विगुणीत झाला.. :)

सगळं बघून शेवटी मंदिरापाशी परतलो.. तिथे आडोशाला थोडी विश्रांती घेतली.. भटकंती करून भूक लागलीच होती मग घरून आणलेल्या डब्यांवर सर्वांनी ताव मारला..  साधारण दोन वाजता गड उतरायला लागलो.. आणि आता त्या वाऱ्याच्या टप्प्यावर तर सकाळपेक्षा  अजून जास्त वारा वाहात होतां.. तो इतका का वेडावला होतां कोणास ठाऊक.. वाऱ्याच्या दिशेने पाठ करून उभे राहिले तर आपोआप पुढे ढकललो जात होतो.. इथे फारच सही वाटत होते.. या वाऱ्याचा अनुभव शब्दात मांडणं खरंच कठीण आहे..

खाली उतरताना पळत पळत जावे असं वाटत होते.. पण माझी पावले मात्र जरा जड झाली होती... मागे फिरून पुन्हा पुन्हा मी शक्य तेव्हढे दृश्य मनात साठवायचा प्रयत्न करत होते.. तासाभरात आम्ही गाड्यांपाशी आलो..  आणि ट्रेकच्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही पुण्याच्या रस्त्याला लागलो..

मला नेहमी जाणवतं की प्रवास भटकंती करण्यामागे केवळ मौजमजा हा हेतू नसतो.. उलट नवनवीन जागा पाहून, वेगवेगळ्या लोकांशी सवांद साधून दरवेळी आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.. शेवटी अनुभवातूनच ज्ञानाचा वेल वाढत जातोना.. तसंच या एक दिवसाच्या ट्रेक मधून अन मित्रमैत्रिणींकडून मी ज्या गोष्टी शिकले त्याची इथे मनापासून नोंद करावी वाटते..
- हे ट्रेकर्स लोक निसर्गाचा आनंद घेताना आपल्यामुळे शोभा खराब होणार नाही याची नीट काळजी घेतात.. चोकलेट, चिप्स खाल्ल्यावर  त्याचा कागद,प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या तिथे किल्ल्यावर तशाच टाकून देणं हे म्हणजे आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड मारल्यासारखे आहे नाहीका..
- निखळ आनंद घेण्यासाठी नसते धाडस दाखवायची गरज नसते.. सरळ रस्ता असताना उगाच कोणी शॉट कट मारायला गेले तर अशांना ही ट्रेकर्स मंडळी वेळीच आवर घालतात.. दुर्गम भागात  अनुभवी लोकांचा ऐकलेलं कधीही चांगलं..


इतकं सगळं वाचून मला खात्री आहे की आता तुम्हालाही रोहिड्याला एकदा भेट द्यावी असे वाटू लागले असेल.. :) हा किल्ला सुंदर असूनही चढण्यास  सोपा आहे त्यामुळे कोणालाही  जाता येण्यासारखा आहे..  रोहिड्याला भेट देण्यासाठी जायचे असल्यास जून - फेब मध्ये बेत करावा..  गडावरचे द्वार, बुरुज आणि तिथून दिसणाऱ्या सह्याद्रीचे अफाट दर्शन आवर्जून घ्या.. तिथल्या वाऱ्याचा, फुलांचा अनुभव नक्की घ्यावा.. आकाश निरभ्र असल्यास तिथून दिसणारा सुंदर सूर्यास्त चुकवू नका.. वरती खाण्यापिण्याची काही सोय नसल्याने जेवायचे डबे आणि पुरेसे पाणी जवळ ठेवा.. आणि वारा सहन होत नसल्यास स्कार्फ , कापूस वगैरे गोष्टी जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येईल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: