शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

मंतरलेले दिवस - ३६

कॅलेंडर प्रमाणे श्रावण महिना वर्षातून एकदाच येतो.. पण जीवनयात्रेत मात्र श्रावणाच्या उन्ह पावसाचा खेळ सतत अविरत चालू असतो.. आताही उन्हाची एक झळ लागली होती आणि मन कोरडं झालं होतं.. चालता चालता नेहमीच्या मंदिरात प्रवेश केला.. देवाची ती मूर्ती नेहमीसारखीच प्रसन्न दिसत होती.. हात जोडून प्रार्थना करायचे प्रयत्न केले पण मन शांत नव्हतं.. बाकी सगळे मनापासून प्रार्थना करत होते,देवाकडे काहीना काही मागत होते.. मी हसून म्हणलं.. आज काय मागू मी तुझ्याकडे? जे मला मनापासून पाहिजे ते मला कधीच मिळणार नाही.. आणि जे आहे त्यात मन तृप्त होत नाही, मनाला सारखं काहीतरी नवीन हवंच असतं.. आणि खरतरं मला नक्की काय हवंय हे मुळात माहितीच नाहीये.. तूच माझं अंतरंग जाणतोस.. तुला वेगळं काय सांगू मी पुन्हा?

विचारांच्या वादळात हरवले असता अशातच तिकडे एक छोटीशी गोड पोरगी तिच्या आईसोबत आली.. आईने सांगितल्यावर त्या मुलीने इवले नाजूक हात जोडले.. बोबड्या शब्दात ती म्हणली "देवा मला चांगली बुद्धी दे!!!"  आणि त्या क्षणी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.. :) खरंच पैसे, रूप, नाती, पत इत्यादी या गोष्टी येतात आणि जातात.. या सर्व गोष्टी असून जर चांगली बुद्धी आपल्याकडे नसेल तर सगळंच निरर्थक आहे..आणि हे काही आपल्याकडे नसेल पण चांगली बुद्धी असेल तर पुढे मागे या गोष्टी नक्कीच मिळवता येतातना..

लहानपणी चांगला अभ्यास करण्याची बुद्धी.. खेळ आणि कला कौशल्य आत्मसात करण्याची बुद्धी.. नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, कोणत्या क्षेत्रात आपला निभाव लागेल हे समजून त्याप्रमाणे निर्णय घ्यायची बुद्धी.. चांगले मित्रमैत्रिणी मिळवण्याची आणि टिकवण्याची बुद्धी.. इतरांना गरज पडेल तेव्हा मदत करण्याची बुद्धी.. शिक्षण झाल्यावर चांगली तयारी करून नोकरी धरायची बुद्धी.. नोकरीत प्रामाणिकपणे  १००% काम करण्याची बुद्धी..

सर्वात महत्वाचं म्हणजे कोण आपलं आणि कोण परकं हे अचूक ओळखण्याची बुद्धी.. मोहाला बळी पडून स्वतःचं नुकसान होऊ नये हे वेळेवर समजण्याची बुद्धी.. नाजूक हळुवार क्षणांना आवर घालण्याची बुद्धी.. आपल्या भविष्याचा विचार करून पाऊल उचलण्याची बुद्धी.. आई वडील सांगतील ते ऐकण्याची बुद्धी.. वेळेत लग्न करून संसार सुरु करण्याची बुद्धी.. वेळेवर सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायची बुद्धी.. सगळ्यांची मने सांभाळून गुण्यागोविन्दात काळ घालवण्याची बुद्धी.. आपल्या परीने प्रयत्न करून शेवटी जे पदरात पडेल त्याचा मनापासून स्वीकार करण्याची बुद्धी.. आणि अजून असंच काही...

जेव्हा जेव्हा मी स्वतःचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की मी डोक्यापेक्षा हृदयाचे जास्त ऐकते.. निर्णय घेताना मी बुद्धीपेक्षा भावनांचा जास्त विचार केला.. त्यामुळे कित्येकदा घसरले.. वेळ आणि जग तर केव्हाच पुढे निघून गेलं.. असे असले तरी मला माझ्या गत आयुष्याबद्दल खेद नाहीये.. आतापर्यंत मी प्रत्येक क्षण मनापासून जगले.. हसले अन रडलेही मनापासून.. आता फक्त एव्हढंच वाटतं की माझ्या हळव्या भावनांना चांगल्या बुद्धीचे सरंक्षण मिळावे म्हणजे पुढील उर्वरित आयुष्य सुखकर समाधानी जाईल..

आताशा मीसुद्धा बाप्पाला त्या लहान मुली कडून शिकलेली प्रार्थना करते की.. "आम्हा सर्वाना चांगली बुद्धी दे!!! "  special thanks to that little girl.. :)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: