नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने! :)

कधी कधी आपण सगळं आधीपासून नीट ठरवूनही एखाद्या सरळ साध्या गोष्टीसाठी खूप आटापिटा करावा लागतो हे मी नुकतच जवळून अनुभवले.. निमित्त होते सर्टिफिकेशनचे.. इन्फीमध्ये दर सहा महिन्याला सगळ्यांनी अगदी फ्रेशर पासून मॅनेजर पर्यन्त सर्वांनी सर्टिफिकेशन परीक्षा द्यायची असते.. तुमच्या लेव्हलप्रमाणे तुम्ही विषय निवडू शकता.. तसं इथे दरवेळी अगदी कोणी विचारत नाही की परीक्षा दिली का पण नाही दिले तर बॅकलॉग्स राहतात आणि इथे राहायचे असेल तर आज ना उद्या ते द्यावेच लागतात.. यावेळेस मी डिसेंबर मध्येच द्यायचे ठरवले होते.. एकदाचे उरकून टाकु म्हणजे मग नंतर निवांत होऊ.. आनायसा प्रीतीकडून नॉट्स आणि २१ अपेक्षित मिळालेच होते..  :)  त्यासाठी नोंदणी मी नोव्हेंबर मध्ये केली होती.. पण engineering वाईट सवय.. पीएल्स मध्येच अभ्यास करायचा,आधी टाइमपास..  त्याप्रमाणे डिसेंबर उजाडला आणि मला सर्टिफिकेशनची आठवण झाली.. कुठल्या तारखेचा स्लॉट बुक केलाय पाहायला त्या साईटवर गेले तर माझ्या पेजवर काहीच दिसत नव्हते.. त्या साईटचे नूतनीकरण झाले होते त्यामुळे कदाचित थोड्या अडचणी येत होत्या.. मग मी तक्रार नोंदवली.. इथे ईनफी मध्ये कुठल्याही छोट्या कामासाठी देखील मोठ्या प्रोसेस असतात.. प्रोसेसिंग चालू असताना मला माझ्या परीक्षेची तारीख बिलकुल आठवत नव्हती त्यामुळे मी अजिबात अभ्यास केला नाही.. आणि एक दिवस थेट मेल आला,उद्या तुमचा पेपर आहे.. छे,मीतर काहीच वाचलं नव्हतं आणि नापास होण्यापेक्षा दांडी मारलेली बरी असा मी विचार केला.. पेपर रद्द केला..

जानेवारी मध्ये त्या साईटची दुरुस्ती झाली पण आता मी अंदमानच्या ट्रिप मूड मध्ये होते त्यामुळे अभ्यास होणे शक्य नव्हते..  ट्रिपनंतर कितीतरी दिवस मी अंदमान मध्येच होते,बाहेर यायला जरा वेळ लागला म्हणून अभ्यास नाही झाला.. :)  फेब्रुवारी उजाडल्यावर म्हणले आता बास, दोन महिन्यापासून हे प्रकरण चाललय ते आता मिटवून टाकू.. १४ फेब, अनुरागदिनाच्या शुभमुहूर्तावर परीक्षा द्यायचे ठरवले आणि पुन्हा नोंदणी केली.. हळुहळु अभ्यास सुरू केला.. माझ्या सारख्या कविता/ लेख/ गाणी/ फोटोस यामध्ये रमणार्‍या मुलीला एकाग्रतेने अभ्यास करणे फार कठीण होते.. वाचायला लागले की मनात काही वेगळेच विचार येणार.. तेव्हा वाटले नशीब मला शाळा/ कॉलेज मध्ये असे  काही नाद नव्हते.. :)

अशा रीतीने दिवस पुढे जात होते.. परीक्षेच्या आदल्या दिवशी परत गोंधळ.. 'उद्या अमक्या वेळेस तुमचा हा पेपर इथे आहे' अशा संदर्भात मेल आला तेव्हा हम आपके है कौन मध्ये लग्न पत्रिकेवर दुसर्‍याचे नाव वाचून  माधुरी दिक्षितची जशी स्थिती झाली, अगदी तशीच माझी अवस्था झाली.. कारण मेल मध्ये पेपरचे नाव वेगळ्याच विषयचे लिहिले होते आणि मी अभ्यास दुसर्या विषयचाच करत होते.. आता उद्याच पेपर आहे म्हणल्यावर मला विषय बदलणे शक्य नव्हते.. अभ्यास करूनही पुन्हा तो पेपर रद्द करणे भाग होते.. चुक माझीच होती, मी नोंदणी करताना गडबड केली होती पण तरी चिडचिड झाली कारण डिसेंबर पासून हे सर्टी माझे डोके खात होते.. १४ ऐवजी आता १५ला देऊ म्हणले तर १४ला अख्खा दिवस माझी तब्येत खुपच खराब होती त्यामुळे ते शक्य झाले नाही.. मग १६ला द्यायचे ठरवले..

आता १६ला तरी काही विघ्न येऊ नये अशी  मनातून प्रार्थना केली.. पण छे,गोष्ट अजुन संपली नव्हती.. १६ला नेमका मतदानाचा दिवस आला.. ऑफीसने सकाळी दोन तास खास मतदानासाठी दिले होते आणि बस उशिरा ठेवल्या होत्या.. माझ्या स्टॉपवर बस ९.४०ला येणार होती.. १०.३०ला परीक्षा सुरू होणार होती.. इंफिच्या बस कायम अगदी वेळेवर येतात आणि त्या बसने मी १०.३०पर्यंत ओफिसमध्ये नक्कीच पोहचेन असा माझा विश्वास होता.. पण आज पुन्हा गडबड झाली.. १०पर्यंत बसचा पत्ता नाही.. आता आजचा पेपरही हमखास बुडणार असे मला वाटू लागले होते.. १०नंतर एक बस आली पण ती भरली असल्याने माझ्या स्टोपवर थांबत नव्हती.. पण माझ्यासारखेच एक्‌दोन जण ज्यांना ओफिसमध्ये जायची अतिशय घाई होते असे आम्ही काहीजण अगदी रस्त्याच्या मध्ये जाऊन बसला थांबवले.. उभ राहून येतो असे म्हणून जबरदस्ती बस मध्ये बसलो.. बसमध्ये बसाल्यावर थोडे बरे वाटे पर्यंत एक्सप्रेस मार्गावर  'work in progress' चा फलक दिसला.. यावेळेस  सर्टीचे योग नाहीयेत का असे विचार येऊ लागले.. जाऊदे जमले तर पेपर द्यायचा नाहीतर नाही असे ठरवून मी शांत बसले कारण ट्रॅफिकचे माझ्या हातात आता काहीच नव्हते.. पुढे कशीबशी पळत पळत परीक्षा द्यायला गेले.. या परीक्षेचे डिसेंबर पासून बरेच घोळ झाल्याने मी इतकी जास्त कन्टाळले होते म्हणून की काय पण मी अर्ध्या तासात पेपर देऊन बाहेर आले.. पास झाल्यामुळे बरे वाटले आणि एकदाचे ते सर्टीफिकेशन प्रकरण संपले म्हणून निवांत झाले.. :)

माझी तयारी केव्हापासून चालू होती पण ते फेब मध्ये व्हायचे होते तर.. ही गोष्ट साध्या सर्टीफिकेशनची..  त्याच प्रमाणे  जीवनात नोकरी, लग्न, घर वगैरे सगळ्या गोष्टींसाठी एक वेळ यावी लागते असे म्हणतात.. योग नसेल तर कितीही खटपट केली तरी यश मिळत नाही आणि योग आले की सगळे आपोआप जुळून येते असे ऐकले आहे.. माझ्या पत्रिकेत बरेच शुभ योग अजुन जुळून यायचे आहेत.. पाहुया कधी ग्रहस्थिती अनुकूल होते ते, तोपर्यंत हताश न होता प्रयत्न चालू ठेवायचे,होना.. :)